लांडग्याच्या नेतृत्वात गोटफार्म ? ओबीसी, बहुजनांची लढाई ! - ज्ञानेश वाकुडकर


 वाघ आपल्याला केव्हा खातो, जेव्हा आपण त्याच्या प्रदेशात प्रवेश करतो तेव्हा ! लांडगा आपल्यावर केव्हा हमला करतो, आपण त्याच्या रेंजमध्ये गेलो तरच ! वाघ गावात घुसला आणि त्यानं एकाच वेळी ५/१० माणसं मारली असं आपण कधी ऐकलं का ? तो चुकून कधी गावात घुसलाच तर लोकांना जखमी करू शकतो. एखाद दुसऱ्या व्यक्तीला मारू शकतो. पण त्यामागे भीती हा फॅक्टर काम करत असतो.

 समजा वाघांनी गावावर सामूहिक हमला करायचं ठरवलं. तर वाघांची संख्या गावच्या तुलनेत कितीशी असेल ? गाव पूर्ण तयारीत असला, तर वाघांची डाळ तरी शिजेल का ? मुख्य मुद्दा असा, की व्यवहारी वाघ असा अविचार करणार नाहीत. 


आणि आणखी एक, सारेच वाघ नरभक्षी नसतात..!


• वाघांची जर ही अवस्था असेल, तर लांडगे, कोल्हे यांच्यापासून संघटित गावांना खरं तर फारसी भीती बाळगण्याची गरज नसते. पूर्ण तयारीनिशी जंगलात जाणाऱ्या लोकांनीही घाबरण्याचं कारण नसते. म्हणूनच आपण जंगल सफारीचा आनंद घेवू शकतो. वाघ कधी शहर सफारीसाठी येत नाही.


• आम्ही नेमकं काय करतो ? कोल्ह्यांच्या विरोधात परिषदा घेतो. लांडग्यांना शिव्या घालतो. पण आपल्या शेताला कुंपण घालत नाही. आपल्या बकऱ्यांची राखण करत नाही. त्यांच्या रोजच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करत नाही. 


आपल्या बकऱ्या खुल्या रानात चराव्या आणि रात्री सुरक्षित घरी परत याव्यात, अशी आपली अपेक्षा असते. मग लांडग्यांनी उपाशी मरायचं का ? त्यानं तुमच्या बकऱ्यांच्या सुरक्षेची काळजी का करावी ? त्यापेक्षा तुम्ही तुमच्या बकऱ्या त्याच्या रेंजमधे जाणार नाहीत, याची काळजी का घेत नाही ? तुम्ही तुमच्या बकऱ्यांची काळजी घ्या. तो त्याच्या खाण्यापिण्याची पर्यायी व्यवस्था पाहून घेईल.


• रान काही लांडग्याचं नसते. जंगल, पहाड, नदी, नाले हेही लांडग्याच्या बापाचे नसतात. पण आपण मूर्ख असल्यामुळे तो त्याच्यावर हक्क सांगतो. आपण मूर्ख आहोत, आपण असंघटित आहोत, आपली शक्ती आपल्याला माहीत नाही !आपल्यातले काही मूर्ख देखील त्यांच्या कळपात सामील होऊन  सुरात सुर मिसळायला लागतात. त्यात लांडग्याच्या काय दोष ?


• सद्या या देशातला सर्वात मोठा पक्ष हा नरभक्षी विचारधारा असलेला पक्ष आहे, हे जेवढं सत्य आहे, तेवढीच तुमची मतदार म्हणून ताकद आणि संख्या देखील कितीतरी मोठी आहे. मग तुम्ही लांडग्याच्या कळपात कशाला सामील होता ? तुमचा पक्ष, तुमची विचारधारा, तुमची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी तुम्हाला कुणी अडवलं आहे ? तसा प्रयत्न का करत नाही ?


• भाजपा हा एक सापळा आहे, हे आधी समजून घ्यावं लागेल. आपल्या बकऱ्या त्यांच्या कळपात का सामील होतात ? याचा नीट विचार कधी केला का ? एक बकरी गेली की तिच्या पाठोपाठ अख्खा कळप चालायला लागतो. आणि आयताच लांडग्याच्या तावडीत सापडतो ! आमची बकरी त्यांच्या रेंजमधे जाणारच नाही, याचा बंदोबस्त आम्ही का करत नाही ? कधी विचार केला का ? की केवळ परिषदा, भाषणं, त्यांच्या नावानं शिव्याशाप, धर्माच्या नावानं शिव्याशाप, एखाद्या जातीच्या नावानं शिव्याशाप यातच आमची गाडी फसून आहे का ? केवळ अशा शिव्याशाप दिल्यामुळे आमचे सारे प्रश्न सुटून जातात का ?


• किंवा ज्या ज्या बकऱ्या त्यांच्या कळपात सामील झाल्या, फितूर झाल्या, त्यांच्यापासून आम्ही नातं का तोडत नाही ? त्यांचा बंदोबस्त का करत नाही ? त्यांच्यावर बहिष्कार का टाकत नाही ?


• तुमची राखण तुम्हालाच करायची आहे. तुमचं नेतृत्व तुम्हालाच करायचं आहे. तुमचं शेत तुम्हालाच राखायचं आहे. लांडग्याच्या भरवशावर गोटफॉर्म चालवणे, हा अफलातून शोध कुणी लावला ?


• तेव्हा, 

एक व्हा, नेक व्हा..! 


तूर्तास एवढंच..

-

ज्ञानेश वाकुडकर

अध्यक्ष, लोकजागर

•••

टीप - माझा कोणताही लेख/कविता/साहित्य सामाजिक हेतूनं सोशल मीडिया किंवा अन्यत्र प्रकाशित करण्यासाठी, शेअर करण्यासाठी खुली परवानगी आहे. वेगळ्या परवानगीची गरज नाही. 

-

#लोकजागर अभियान मध्ये सहभागी व्हा !

#महागुरूकुल परिवारात सहभागी व्हा ! 

धन्यवाद !

•••

संपर्क - 

लोकजागर अभियान

• 9004397917

• 9545025189

• 9422154759

• 9773436385

• 8806385704

• 9960014116

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या